- उपांत्य फेरीत कांगारूंची शिकार
- टीम इंडियाचा ६ विकेट्सनी दणदणीत विजय
- वर्ल्डकप २०२३ च्या फायनल मधील पराभवाचा घेतला बदला
दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला. दुबईतल्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीच्या ८४ धावा, विराट - श्रेयसची ९४ धावांची भागीदारी, हार्दिकचे दोन षटकार आणि राहुलच्या विजयी षटकारासह भारताने ऑस्ट्रेलियाकडून आयसीसी स्पर्धांच्या पराभवाचा बदला घेत दणदणीत विजय नोंदवला आहे. भारताच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनीही आपला ठसा उमटवला.
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे आव्हान दिले होते. धावांचा पाठलाग करताना भारताने सुरूवातीला २ विकेट्स गमावले होते. पण नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यासह भारताला सामन्यात कायम ठेवले. विराट कोहली पाच चौकारांसह ९८ चेंडूत ८४ धावा करत बाद झाला. विराटने उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वाधिक धावा एकेरी धाव घेत काढल्या आणि ऑस्ट्रेलियावर दबाव वाढवला. श्रेयस अय्यरने ४५ तर अक्षरने २७ धावांची खेळी केली. हार्दिकने अखेरच्या षटकांमध्ये शानदार ३ षटकार आणि एक चौकार लगावत संघाचा विजय सोपा केला आणि २८ धावांची खेळी करत तो बाद झाला. केएल राहुलने ४२ धावांची नाबाद खेळी उभारली.
प्रारंभी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कांगारू संघाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आला नाही. स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली, तर ॲलेक्स कॅरीनेही ५७ चेंडूत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताच्या गोलंदाजांनी कायम भारताला सामन्यात ठेवत संघाच्या विजयाच्या पाया रचला.
उर्वरित फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. याचे कारण भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने १० षटकांत ४८ धावांत तीन विकेट घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतले. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. कुलदीप यादव हा एकमेव गोलंदाज होता ज्याला एकही विकेट मिळाली नाही.
वर्ल्डकप २०११ च्या उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आणि त्यानंतर विजेतेपदही पटकावले होते. यावेळी टीम इंडिया जेतेपदाच्या जवळ आली आहे आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवत स्पर्धेतून बाहेर काढले. यासह टीम इंडियाने तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून हॅट्ट्रिक साधली.
0 Comments