• तब्बल २ तास ठिय्या मांडून केला चक्काजाम 
  • बेळगाव ते बाची रस्त्याच्या दुरवस्थेकडे वेधले प्रशासनाचे लक्ष 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी सकाळी बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे दोन तास भव्य रास्तारोको करून बेळगाव - वेंगुर्ला मार्गावरील हिंडलगा ते महाराष्ट्र सीमेनजीक बाचीपर्यंतच्या खराब झालेल्या रस्त्याचे ताबडतोब नूतनीकरण करून चौपदरीकरण करावे तसेच बेळगाव तालुक्यातील खराब झालेले अन्य रस्तेही दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली, तसेच सदर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलन प्रसंगी रस्ता दुरुस्तीच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निषेधाच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, बेळगावपासून बाचीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे दुरुस्ती केलेले रस्त्यावरील खड्डे पुन्हा दृश्यमान होऊ लागले आहेत. जनतेने सातत्याने निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्ती मागणी केली. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. खरंतर रायचूर ते बाची हा राज्य महामार्ग असताना 2002 साली रायचूर ते बेळगावपर्यंतच्या रस्त्याचा विकास केला गेला. त्यापुढे बेळगाव ते बाचीपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाकडे गेली 22 वर्षे झाली डोळेझाक करण्यात आली आहे. तेव्हा या रस्त्याचे देखील रायचूर ते बेळगाव पर्यंतच्या रस्त्याप्रमाणे नूतनीकरण केले जावे, अशी मागणी आम्ही गेल्या ४ ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली होती.

तथापि रस्ता दुरुस्ती व नूतनीकरणाची आमच्या मागणीची महिना झाला तरी पूर्तता करण्यात आली नसल्याने गेल्या ४ नोव्हेंबर रोजी आम्ही पुन्हा निवेदन सादर करून रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानुसार आज रास्तारोको केला जात आहे. फक्त बेळगाव ते बाची रस्ता नव्हे तर वाघवडे ते मच्छे, बडस ते बाकनुर तसेच बेळगाव तालुक्यातील इतर खराब झालेले रस्ते देखील दुरुस्त करावेत अशी मागणी घेऊन आम्ही आज हा रस्ता रोको करत आहोत. ज्याप्रमाणे रायचूर ते बेळगाव रस्ता करण्यात आला आहे त्याप्रमाणे बेळगाव ते बाचीपर्यंतचा रस्ता देखील करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. खरंतर हा राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे या मागणीला  जोपर्यंत  मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हलणार नाही, असा इशारा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला. 

तर तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते आर. एम. चौगुले, यांनी दोन महिन्यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले होते. मात्र आता सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत आहेत. तेंव्हा नेमके हे काय गौडबंगाल आहे? का आम्ही फक्त नूतनीकरणाऐवजी रस्त्याच्या दुरुस्तीवरच समाधान मानायचे? सध्या रस्त्याची करण्यात आलेली दुरुस्ती देखील वरवरची तात्पुरती आहे, असा सवाल करत जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी येऊन आम्हाला ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा दिला. 

यावेळी रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आदींसह उपस्थित अन्य नेते मंडळींनी रस्त्याच्या नूतनीकरणाची गरज व्यक्त करून माजी आमदार किणेकर यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. 

समितीच्या आंदोलनाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने रास्तारोकोच्या ठिकाणी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी खराब झालेल्या रस्त्याबद्दल माहिती देऊन त्याच्या नूतनीकरणाची मागणी केली. तसेच तशा आशयाचे निवेदन अभियंत्यांना सादर केले. 

निवेदनाचा स्वीकारून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बेळगावपासून बाचीपर्यंत जाणारा हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील चौपदरी रस्त्याचा बॉक्साईट रोड क्रॉसवरील समितीच्या हुतात्मा स्मारकापर्यंत विस्तार केला जाईल. त्याचप्रमाणे हिंडलगापासून पुढे बाचीपर्यंत जो रस्ता आहे त्याचे नूतनीकरण करून व्यवस्थित विकास साधला जाईल आणि रस्त्याचे हे काम येत्या १ डिसेंबर २०२४ पर्यंत हाती घेण्यात येईल. तत्पूर्वी बाचीपर्यंत रस्ता  चौपदरीकरणाच्या मागणीबाबत सरकारशी चर्चा करून योग्य कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. त्यांच्या या ठोस आश्वासनानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने छेडण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे तब्बल दोन तास बेळगुंदी क्रॉस येथे बेळगाव - वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प  झाली होती. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या रास्तारोको आंदोलनात बेळगाव तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सचिव एम. जी. पाटील, सहसचिव मनोहर संताजी, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते आर. एम. चौगुले, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, माजी जि. पं. सदस्या रामचंद्र मोदगेकर, सरस्वती पाटील आदींसह तालुक्याच्या सर्व भागातील समिती नेते व कार्यकर्त्यांसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.