• निवडणूक आयोगाचा निकाल
  • शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे  निवडणूक आयोगाने स्पष्ट केले  आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचे प्रकरण प्रलंबित होते. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.

अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आणि नाव दिल्याने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना हा सर्वोच्च राजकीय धक्का मानला जात आहे . निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (७ फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आले आहे.