- बुमराह - अश्विनचा प्रभावी मारा
- पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी
विशाखापट्टणम : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला १०६ धावांनी (Ind vs Eng) लोळवून ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आर अश्विनने (R Ashwin) भेदक गोलंदाजी करत, इंग्लंडच्या फलंदाजाना गुंडाळण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या ३९९ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसऱा डाव २९२ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने चौथ्या दिवशीच ही कसोटी आपल्या खिशात टाकली.भारतीय संघाच्या या विजयात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाचे योगदान दिले. जसप्रीत बुमराह याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तत्पूर्वी हैदराबादमध्ये झालेली पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हान होते. मात्र, त्यांचा दुसरा डाव २९२ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी साकारली. यामध्ये ८ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्याशिवाय एकही इंग्लिश फलंदाज मोठी खेळी साकारण्यास अपयशी ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराह याने या कसोटीत ९ विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने ६ गडी बाद केले. तर, दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ३ गडी बाद करत बुमराहाला चांगली साथ दिली.
भारताने या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात टीम इंडियाने 396 धावा केल्या. यामध्ये सलामीचा फलंदाज यशस्वी जैयस्वाल याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकवताना २०९ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २५३ धावा केल्या. बुमराहने भेदक मारा करत सहा विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीन इंडियाचा दुसरा डाव २५५ धावांत आटोपला. इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले. मात्र, त्यांना हे आव्हान पेलवले नाही.
पहिल्या कसोटीत आघाडी घेऊनही सामना गमावण्याची नामुष्की पहिल्या कसोटीत टीम इंडियावर ओढावली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
0 Comments