बेळगाव / प्रतिनिधी 

येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलक खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून १५३ अ दोषारोप पत्राची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर न केल्यामुळे तसेच पोलीस अधिकारी एन. व्ही. बरमनी साक्षीसाठी सातत्याने गैरहजर असल्याने १६७ / १५ खटल्यातून एकूण २६ जणांची बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.यापूर्वी गेल्या मंगळवारी दि. १० ऑक्टोबर रोजी उपरोक्त खटल्याची न्यायालयात सुनावणी झाली होती.

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये शांताराम राणू कुगजी, सतीश मनोहर कुगजी, राजू ओम्माण्णा धामणेकर, अशोक मारुती धामणेकर, विनोद जयवंत जाधव, रामा नारायण कुगजी, चंद्रकांत भीमाप्पा हंपण्णावर, शिवाप्पा निंगाप्पा हंपण्णावर, राहुल मारुती कुगजी, हेमंत लक्ष्मण नायकोजी, निलेश महादेव कुंडेकर, प्रकाश मल्हारी पाटील, उदय शंकर जाधव, चांगाप्पा गंगाराम कुगजी, श्रीधर जोतिबा जाधव, दिनेश मारुती घाडी, लक्ष्मण परशुराम कुगजी, योगेश पिराजी मजुकर, उमेश पांडुरंग जाधव, मंजुनाथ सोमय्या हिरेमठ, महेश भुजंग कुगजी, नागराज रेमानी कुगजी, प्रशांत कृष्णा टक्केकर, सुरेश रेमानी कुगजी, रामा भरमाण्णा पाटील आणि बबलू नारायण अष्टेकर यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने जुलै २०१४ मध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात येळळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटवल्यानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या मराठी जनतेला पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणार्‍या २२२ जणांवर गुन्हे दाखल करून खटले दाखल करण्यात आले. १५३ अ कलमान्वये दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सरकारची परवानगी घ्यावी लागते. पोलिसांनी त्यानुसार सरकारची मंजुरी घेतली होती. मात्र त्याची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर केली नव्हती. त्याचप्रमाणे वारंवार समन्स बजावून देखील पोलीस अधिकारी एन. व्ही. बरमनी न्यायालयासमोर साक्षीसाठी हजर न राहिल्यामुळे  सर्वांची केस नं. १६७ / १५ खटल्यामधून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

गेली ९ वर्षे हा खटला सुरु होता. महाराष्ट्र राज्य फलकातील एकूण सात खटल्यांपैकी पहिला खटला निर्दोष झाला आहे. एकूण २२२ संशयित  होते त्यापैकी अद्याप १९६ जणांच्या खटल्याची सुनावणी बाकी आहे.  या सुनावणीला म. ए. समितीचे सर्व २६ संशयित उपस्थित होते. त्या सुनावणीत सर्व संशयितांचे जवाब नोंदवण्यात आले होते. त्यानंतर आज बुधवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी २६  जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्यांच्यावतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. हेमराज बेंचण्णावर, अ‍ॅड.शाम पाटील, अ‍ॅड. महेश मोरे, शंकर बाळनाईक, विशाल चौगुले आदि वकिलांनी काम पाहिले. यावेळी वकील मारुती कामानाचे आदी उपस्थित होते.