नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडचा डाव ४७.४ षटकांत सर्वबाद २४८ धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने ३८.४ षटकात ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
मात्र २४९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. पदार्पणवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने सुरूवात केली. पण आर्चर आणि साकिब महमूद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर दोघांना फारश्या धावा करता आल्या नाहीत आणि दोघेही झेलबाद होत माघारी परतले. कर्णधार रोहितने (२) पुन्हा एकदा निराशा केले. कसोटी फॉर्मेटमध्ये त्याचा खराब फॉर्म वनडेमध्येही कायम राहिला.
रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक सुरूवात केली आणि भारतीय संघाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार खेळी करत विजयाचा पाया रचला. विशेषतः, अय्यरने येताच आक्रमक फलंदाजी केली आणि आर्चरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकारा लगावत आपले मनसुबे जाहीर केले. श्रेयस अय्यरने ३० चेंडूत अर्धशतकी खेळी पूर्ण केली. श्रेयस अय्यर ३६ चेंडूत ५९ धावा करत जेकन बेथेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. ११३ धावांवर असताना श्रेयस अय्यरची विकेट गेली. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण होते. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अक्षरला बढती मिळाली आणि त्याने गिलबरोबर १०८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे विजय निश्चित झाला. अर्धशतक झळकावल्यानंतर अक्षर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर शुबमन गिल त्याच्या शतकापूर्वी ८७ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संघाला विजयापर्यंत नेले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाची इंग्लिश सलामीवीरांनी चांगलीच धुलाई केली. फिल सॉल्ट आणि बेन डकेटने अवघ्या ९ षटकांत ७५ धावा करत जोरदार सुरूवात केली. पण फिल सॉल्ट धावबाद झाल्यानंतर टीम इंडियाने पुनरागमन केले. यात हर्षितची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची होती. त्याने आधी बेन डकेट (३२) आणि नंतर हॅरी ब्रूक (०) यांची विकेट घेतली. रवींद्र जडेजाने पुन्हा जो रूटला (१९) आपला बळी बनवले.
मधल्या फळीत कर्णधार जोस बटलरसह युवा अष्टपैलू जेकब बेथलने संघाचा डाव उचलून धरला. प्रथम बटलरने (५२) अर्धशतक झळकावले आणि नंतर तो बाद झाल्यानंतर जेकब बॅथल (५१) यांनी संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले मात्र तोही जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटी, जोफ्रा आर्चरने (२१) काही मोठे फटके मारले आणि संघाला २४८ धावांपर्यंत नेले. हर्षित आणि जडेजाने प्रत्येकी ३ विकेट घेतले, तर शमी, अक्षर आणि कुलदीप यादव यांना १-१ विकेट मिळवण्यात यश मिळाले.
0 Comments