बेळगाव : संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगाव येथे १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेले कंग्राळी गावचे सुपुत्र पैलवान मारुती बेंन्नाळकर व बाळू निलजकर यांना अभिवादन प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही  करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता कंग्राळी खुर्द येथे हा अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

हा हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम झाल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे दुपारी ठीक तीन वाजता कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्याना सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या याचिकेबद्दल, व सीमाप्रश्न लवकरात मार्गी लागावा यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाच्या कार्यक्रमानंतर मराठा महासंघ यांच्या वतीने कोल्हापूर येथील बिंदू चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

तरी या अभिवादन व निवेदन देण्याच्या कार्यक्रमांमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्यांनी, युवा आघाडीच्या व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, आजी - माजी लोकप्रतिनिधींनी, मराठी भाषिकांनी, सीमावासीयांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस अँड एम. जी.पाटील यांनी केले आहे.