• कै. एम.डी.चौगुले दहावी व्याख्यानमालेस सुरुवात

बेळगाव : वर्षभर त्या त्या शाळेच्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन केले जाते पण तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेंमुळे विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते असे विचार युवानेते मदन बामणे यांनी मांडले.

कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून  आयोजित इयत्ता दहावी व्याख्यानमालेच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष आर. एम. चौगुले होते.

व्यासपीठावर मल्लाप्पा चौगुले, एन.के.कालकुंद्री, ग्रामपंचायत सदस्य नागेश चौगुले, शंकर सांबरेकर, मुख्याध्यापक वाय.के. नाईक,तज्ञ शिक्षक टी. आर. पाटील व इतर उपस्थित होते.

सुरुवातीला अरविंद पाटील यांनी प्रास्ताविक करीत असताना गेली आठ वर्षे सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले.

त्यानंतर मुख्याध्यापक नाईक यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले तर मदन बामणे यांच्याहस्ते कै. एम. डी. चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.


शेवटी अध्यक्षीय समारोप करताना आर. एम. चौगुले यांनी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले आणि या व्याख्यानमालेचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यावा आणि आपल्या विषयावर अडचणी त्या त्या शिक्षकांना विचारून आपण पैकीच्या पैकी गुण कसे मिळवू यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंघ यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर पी. आर. पाटील यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. यामध्ये गणित विषय कसा सोपा आहे आणि आपण गणिताच्या परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी विस्तृत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले