- युवा समिती सैनिकांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
येता १ नोव्हेंबर काळा दिन हा सुतक दिन म्हणून पाळण्यात यावा याची रूपरेषा ठरवण्यासाठी दि. रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे सीमा भागातील युवा समिती सैनिकांची बैठक पार पडली. बेळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत अनेक जणांनी आपले विचार मांडले. या बैठकीत निपाणी युवा समितीचे पदाधिकारी व सांगली येथील युवकांनी सहभाग घेतला होता. सांगलीसह निपाणी येथेही काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येईल अशी ग्वाही या युवकांनी दिली. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला व १९५६ साली झालेल्या अन्यायाला आता ६९ वर्षे पूर्ण झाली असून तत्कालीन केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी पुढील काळात युवकांनी त्यात भव्य प्रमाणात सहभाग घ्यावा,सर्वांनी गांभीर्याने भाग घेऊन मूक सायकलफेरी यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला पीयूष हावळ यांनीही मार्गदर्शन केले. तसेच निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,सुनील किरळे, कपिल बेलवळे, रमेश कुंभार, तात्यासाहेब कांबळे तर सांगलीहून रविकिरण विश्वनाथ काशिद, सूरज दरेकर, किरण काकडे, प्रशांत मयेकर, अभिनंदन पाटील, प्रथमेश मगदूम, बेळगावचे मनोहर हूंदरे,चंद्रकांत पाटील,रमेश माळवी, अशोक घगवे, अभिजीत मजुकर, बळीराम पाटील,शांताराम होसुरकर,राजू पाटील,भूपाल पाटील,रजत बोकडे,प्रसाद मरगाळे, प्रकाश हेब्बाजी, युवा सेनेचे विनायक हुलजी,बाबू पावशे,मल्लाप्पा पाटील, प्रकाश सुतार असे शेकडो युवक या बैठकीला उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी आभार मानले.
0 Comments