- आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याचे उघड
अथणी / वार्ताहर
अथणी मधील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या ४ व ३ वर्षांच्या दोन लहान मुलांचे अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघाजणांवर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अपहृत मुलांची सुखरूप सुटका झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. स्वस्ती देसाई आणि वियोम देसाई अशी पोलिसांनी सुटका केलेल्या भावंडांची नावे आहेत. नंबरप्लेट नसलेल्या कारमधून दोन्ही मुलांचे अपहरण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मुलांचे वडील विजय देसाई यांनी सांगितले की, काल गुरूवारी ते व त्यांची पत्नी कामावर गेले होते. यावेळी मुलांची आजी एकटीच घरात असताना अपहरणाची घटना घडली. याप्रकरणी मुलांच्या पालकांनी अथणी पोलिसात मुले हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील आणि इतर कांही लोकांमध्ये आर्थिक वादातून मुलांचे अपहरण झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
काल गुरुवारी अपहरणाची घटना घडल्यानंतर आज शुक्रवारी पहाटे पळवलेल्या मुलांना घेऊन अपहरणकर्ते कारगाडीतून कोहळ्ळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयावरून कार गाडी अडवली. यावेळी अपहरणाच्या घटनेचा उलगडा झाला. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अडविल्यानंतर आरोपींनी पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणासाठी नाईलाजाने गोळीबार करावा लागला.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अपहरणकर्त्यापैकी एक संशयित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले. अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments