•  अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी  निधन झाले आहे. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. 

अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केले. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. 

अतुल परचुरे यांनी कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर चुकीच्या उपचारांमुळे आपले आरोग्य आणखी बिघडल्याचे  सांगितले  होते. जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली असे त्यांनी सांगितले होते.