- खासदार धनंजय महाडिकांचा दावा
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन करत घेतलेल्या भूमिकेला समर्थन दिले. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणे अशक्य असल्याचे मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला. आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असल्याचे वक्तव्य केले आहे.
कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. धक्कातंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असे सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्ह्यातील काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचे वाटत आहे. त्यामुळे भाजपकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे, असे महाडिक यांनी सांगितले.
- अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार युतीत येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर सिद्धकी आणि काल काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आलेत. राज्यात भाजपचे वातावरण झाले आहे. त्यामुळे पुढच्यावेळी अनेक नेते भाजपमध्ये येतील. त्याला कोल्हापुरही अपवाद राहणार नाही, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
- अब की बार चारसो के पार
अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. ते सरकार स्थगितीचे, ठप्प आणि भ्रष्टाचार करणारे सरकार होते. कोविडच्या काळात त्यातून पैसे खाण्याचे काम कोल्हापूरसह राज्यातून झाले. त्या काळात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे दाखले आहेत. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवणे या गाव चलो अभियानाचा उद्देश आहे. काहीच केले नसते तर लोकांनी प्रतिसाद दिला नसता. भाजपला देशात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अब की बार चारसो के पार हे व्हिजन घेऊन भाजपा कामाला लागली आहे, असे महाडिक म्हणाले.
0 Comments