• यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी 

पुढील महिन्यात २४ ते २६ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने आज बुधवारी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख  डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांना निवेदन देण्यात आले.  

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. गुळेद यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने यात्रा काळातील समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात यात्रा काळात कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेस ना डोंगरावर प्रवेश दिला जावा.पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. यात्रा काळात पिण्याचे पाणी, स्वच्छता,पथदीप,देवी दर्शन, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी या संदर्भात विशेष उपाययोजना हाती घेण्यात याव्या. 

पौर्णिमा यात्रेला तीन लाखाहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर उपस्थित असतात. त्यामुळे यात्रा काळात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी. चोरट्यांच्या कारवाया आळा बसावा. यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनाचा स्वीकार करून बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले पुढील महिन्यात होणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवी यात्रा संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांची दखल घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. गुळेद म्हणाले, सौंदत्ती रेणुका देवी यात्रा काळात प्रशासनाच्या वतीने यात्रेकरूंच्या सोयीसुविधांची काळजी घेत असते, पोलीस प्रशासन यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिते संदर्भात त्याचबरोबर वाहतुकीच्या संदर्भात उपाययोजना हाती घेतल्या जातील.असे त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, सुभाष जाधव, गजानन विभुते, अच्युत साळोखे, रमेश बनसोडे, मोहन साळोखे, अशोकराव जाधव, दयानंद घबाडे, केशव माने, आनंदराव पाटील,चेतन पवळ, सतीश डावरे,शालिनी सरनाईक, लता सोमवंशी व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.