- दोन घरातील १५ तोळे सोने , ३५ तोळे चांदी व १५ हजार रोख रक्कम लंपास
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सन्नहोसूर गावात दोन घरात, भर दिवसा चोरी झाली असून चोरट्यांनी एका घरातून १० तोळे सोने व २५ तोळे चांदी तर दुसऱ्या घरातून ५ तोळे सोने व १० तोळे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, खानापूर तालुक्यात व परिसरात सध्या भात कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून शेताकडे जात आहेत. याचाच फायदा घेत चोरट्यांनी संभाजी भरमू पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडून त्यात ठेवलेले १० तोळे सोन्याचे व २५ तोळे चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तर गंगाराम पाखरे यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील तिजोरीत ठेवलेले ५ तोळे सोन्याचे व १० तोळे चांदीचे दागिने तसेच १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
संभाजी भरमु पाटील व गंगाराम पाखरे आपल्या शेतीतील हंगामाची कामे आटपून, सायंकाळी ६ वा. सुमारास आपल्या घरी आल्यानंतर सदर घटना उघडकीस आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गिरीश एम. व गुन्हे अन्वेषण विभागाचे पीएसआय चन्नबसव बबली हे पुढील तपास करत आहेत.
0 Comments