•  म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी : पत्रकांचेही वाटप

 

खानापूर / प्रतिनिधी 

सीमाभागातील मराठी जनता दरवर्षी बेळगावसह सीमाभागात एक नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते. यावर्षीही  १ नोव्हेंबर काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शुक्रवारी जांबोटी येथे पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली व काळादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले.  

या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई. म. ए. समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील. म. ए. समिती जांबोटी विभाग उपाध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस जयराम देसाई. म. ए. समितीचे नेते माजी सभापती मारुती परमेकर, यांच्यासह खजिनदार संजीव पाटील, राजाराम देसाई, शंकर सडेकर, विठ्ठल देसाई, राजू चिखलकर, प्रभाकर बिरजे, प्रताप देसाई, मारुती देसाई, बाळासाहेब देसाई, भैरू मुलगेकर, सातेरी देसाई, मानू कोळपटे, शिवाजी दळवी, सुबराव देसाई, शिवाजी सडेकर, जयवंत घाडी, विठ्ठल राजगोळकर यांच्यासह बहुसंख्य मराठी भाषिक सहभागी झाले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना करून १ नोव्हेंबर १९५६ रोजी बेळगाव , कारवार , निपाणी,  बिदर - भालकी आणि  बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटक राज्यात (तत्कालीन म्हैसूर) प्रांतात  डांबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय झाला आहे. गेल्या ६७ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे परंतु कर्नाटक सरकार गेल्या ६७ वर्षापासून आपल्या घटनात्मक न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मराठी जनतेवर अनेक अत्याचार करून मराठी भाषिकांची मागणी पायदळी तुडवीत आहे. कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती संपवण्याचा चंग बांधला आहे.  मात्र येथील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अध्यापही कायम आहे.