कोल्हापूर / प्रतिनिधी 

साहित्यिक - कार्यकर्ते  प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे (वय ६३) यांचे आज दि. ३१ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.

कथा,कविता, नाटक, चित्रपट पथनाट्य, समीक्षा संशोधनपर लेखन अधिक क्षेत्रांमध्ये राजाभाऊंनी आपली अमिट मुद्रा उमटवली. निपाणीतील कामगार चळवळीतून ते राजकारणात सक्रिय झाले होते. लेखणीही समाज व्यवस्था बदलासाठी असते, या विवेकाने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील अशा नानाविध चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सांगलीत झालेल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

साप्ताहिक साधनाचे लेखक अशीही प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांची ओळख निर्माण झाली ती त्यांच्या भटकंतीवर आधारित लेखनामुळे. विविध राज्यांमध्ये भटकंती करून त्यांनी केलेले लेखन 'साधना'मध्ये तसेच अन्य नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. त्यांची पुस्तके ही प्रसिद्ध झाली. त्यांची काही पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी निवडली गेली. काही पुस्तकांच्या हिंदी भाषेतील आवृत्त्याही प्रकाशित झाल्या. लहान मुलांसाठी त्यांनी लेखन केले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर त्यांचा मित्रपरिवार आहे. गोष्टी वेल्हाळ स्वभावामुळे अबालवृद्धांची त्यांचे मैत्रीचे भावबंध जुळत. त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाली आहे.