बेळगाव / प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली आणि शेतवाडीत जाऊन थांबली. या अपघातात कार मधील एक जण ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. मुनवळळी - नरगुंद मार्गावर आज शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
अजित चंद्रकांत धनवडे (वय ३८, रा. धामोड, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. तर उमेश शिवाजी मराठे (वय ३४), दत्तात्रय लक्ष्मण बरगे (वय ४०) संतोष सुरज सोनवणे (वय ३८) तिघेही (रा. धामोड ता. राधानगरी जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे असून या तिघांवर सौंदत्ती येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कारचालक संतोष सोनवणे हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपल्या कारमधून कोपळ येथे गेले होते. यावेळी ट्रॅक्टरचालक शुभम सुरेश कानकेरकर (रा. केळोशी, खुर्द पैकी कानकेकरवाडी) मित्र उमेश, दत्तात्रय व अजित हे तिघेही त्यांच्या सोबत होते. दरम्यान ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या मूळ गावी परतत असताना सौंदत्ती पासून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या नरगुंद मार्गावर आतमटी गावानजीक कारचालक संतोष सोनवणे यांचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक बसली. यावेळी कार शेतवाडीत जाऊन पलटी झाली त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.
यामध्ये कारचालक संतोषच्या बाजूला बसलेले अजित धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले उमेश व दत्तात्रय तसेच कारचालक संतोष शेती हे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रामदुर्ग विभागाचे डीएसपी रामनगौडा हट्टी, पोलीस निरीक्षक जे. करणेश गौडा, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन कारच्या मागे असलेल्या ट्रॅक्टरचालक शुभम सुरेश कारगेकर यांच्या मदतीने सौंदत्ती पोलिसांनी अपघातातील जखमी व मृत व्यक्तींची ओळख पटवून कुटुंबीयांशी संपर्क साधला.
त्यानुसार धामोड येथील अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातातील मृत अजित हे धामोड परिसरातील प्रसिद्ध ट्रॅक्टर मेकॅनिक होते. तर जखमी उमेश यांचा स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय असून संतोषी लाकूड व्यापारी तर दत्तात्रय हे शेतकरी आहेत. मृत अजित यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जे करुणेशगौडा करत आहेत.
0 Comments