- समितीतील एकीमुळे एकच उमेदवार रिंगणात
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र व अनामत रक्कम भरून उमेदवारी अर्ज सादर केले होते. यामध्ये निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, रुक्माणा झुंजवाडकर यांचा समावेश होता.
पाचही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड कमिटीने पाच इच्छुकांनी एकमत होऊन एकाची निवड करावी असा निकष शुक्रवारच्या बैठकीवरून देण्यात आला होता परंतु पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर विलास बेळगावकर यांनी मतदान प्रक्रियेत उत्सुकता दर्शवली नाही व मतदान प्रक्रियेमधून नाव वगळण्याची त्यांनी निवड कमिटीकडे विनंती केली. त्यानंतर उर्वरित चार उमेदवारांमध्ये मतदान करण्यात आले. एकूण ६२ निवड कमिटीच्या सदस्यांनी ऐच्छिक मतदान केले. मतदान प्रक्रियेत चार जणांची मतपत्रिका तयार करून योग्य उमेदवाराला मतदान करण्यासाठी ६२ निवड कमिटी सदस्यांना अधिकार देण्यात आले. त्यानंतर सर्व निवड समितीच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
या एकूण मतदान प्रक्रियेमध्ये मुरलीधर गणपतराव पाटील यांना बहुमत मिळाले. सदर अधिकृत उमेदवारीची घोषणा म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्यासह निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ दरम्यान करण्यात आली. या निवडीचे सर्व इच्छुक उमेदवारांसह उपस्थित कार्यकारणी व निवड समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले.
0 Comments