• प्रस्तावित रिंगरोड विरोधात झाडशहापूर येथे शेतकऱ्यांचे  रास्तारोको आंदोलन  
  • रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाला दर्शविला विरोध  
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला   दाखवली एकीची वज्रमूठ  

 बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव रिंगरोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला असून त्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आज सकाळी  बेळगाव खानापूर मार्गावर झाडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन छेडलेयावेळी सरकारचा निषेध करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगाव रिंग रोडचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली. रास्तारोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज सकाळी लवकर संबंधित 32 गावातील शेतकऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी येताना दिसत होते. अनेक शेतकरी बैलगाड्यातून आपल्या कुटुंबियांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनात शेतकरी कुटुंबातील मुले आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या महिलांनी हातात रिंग रोड विरोधी फलक धरून रस्त्यावरच ठाण मांडले . या महिलांसह रास्ता रोकोत सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करणारी शेतकऱ्यांची लहान मुले व शाळकरी मुले-मुली लक्ष वेधून घेत होते.

आंदोलनादरम्यान शेतकरी विरोधी रिंग रोड करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जय जवान जय किसान यासारख्या घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या घोषणाबाजी बरोबरच दुसरीकडे भजनी मंडळाचा गजर देखील सुरू होता. त्यामुळे रास्ता रोकोच्या ठिकाणी एक वेगळेच वातावरण अनुभवावयास मिळत होते. आंदोलन स्थळी ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकवण्यात आले होते.

बेळगाव रिंग रोड साठी तालुक्यातील 32 गावांच्या सुपीक शेतजमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग करत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या असल्या तरी न्यायालयीन लढा बरोबरच रस्त्यावरील लढाई देखील महत्त्वाची असल्याने झाडशहापूर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाला आपली ताकद दाखवून दिली. तसेच कोणत्याही परिस्थितीत तिबार पीक देणारी शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देणार नाही असा वज्रनिर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सरकारकडून जाणीवपूर्वक भूमिपुत्राला त्रास देण्याचा उद्योग सुरु आहे. रिंग रोडसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेत प्रामुख्याने मराठी भाषिक शेतकरी चिरडले जाणार आहेत. ३२ गावातील १२७२ एकर सुपीक जमीन गेल्याने अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्वाना सोबत घेऊन हा लढा पुकारला आहे. आम्ही सरकारला कोणत्याही परिस्थितीत जमीन संपादित करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी नंदीहळ्ळी येथील आंदोलनकर्ते शेतकरी परशुराम कोलकार आणि शुभांगी गोरल यांच्यासह अन्य एका शेतकरी महिलेने रिंगरोड विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.

या रास्तारोको आंदोलनात बेळगाव तालुका समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर,माजी जिपं. सदस्या सरस्वती पाटील, आर. एम. चौगुले, ॲड. सुधीर चव्हाणॲड. शाम  पाटील,  ॲड. प्रसाद सडेकर, आर. आय. पाटील आदी नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली संबंधित 32 गावांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बेळगाव-खानापूर मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.