• म. ए. समितीची मूक सायकल फेरी यशस्वी 
  • मराठी भाषिकांचा लक्षणीय सहभाग

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर भालकीसह बहुल भाषिक सीमाभाग अन्यायकारकरीतीने कर्नाटकात डांबण्यात आला. याचा निषेध म्हणून  सन 1956 पासून 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राजोत्सवादिवशी काळा दिन पाळण्यात येतो. म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली तमाम मराठी भाषिक एकत्र येत महाराष्ट्र जाण्याची उत्कट इच्छा  तिडकीने प्रकट करतात.

दरम्यान आजही एक नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला धर्मवीर संभाजी उद्यानापासून आज सकाळी प्रारंभ झाला. काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर तमाम मराठी भाषिक सकाळपासूनच एकवटले होते. यानंतर सकाळी 9 वाजता म.  ए. समितीच्या नेतृत्वाखाली मूक सायकलफेरीला सुरुवात झाली. दंडाला काळ्याफिती, काळे कपडे परिधान करून युवक- युवती, महिलांसह, लहान मुलेही उस्फूर्तपणे या मूक सायकल फेरीत सहभागी झाली आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी ही सायकलसह मोर्चात सहभाग घेतला होता. 

-संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दणाणला परिसर -


मूक सायकल फेरीला सुरुवात होताचं मराठी भाषिकांनी, बेळगाव कारवार, निप्पाणी बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय जात नाही, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

सीमा लढ्यासाठी रणरागिणी रस्त्यावर - 

सीमा प्रश्न सुटावा या मागणीसाठी रणरागिणीही पुरुषांच्या बरोबरीने लढा देत असून आज काळ्या दिनात सहभागी महिलांच्या संख्येने त्याचे प्रत्यंतर दिले.

रणरागिणींच्या प्रतिक्रिया :

(1)

सरिता पाटील,(माजी महापौर) 
सीमा प्रश्न सुटावा या मागणीसाठी सन 1956 अर्थात गेल्या 66 वर्षापासून मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. मराठी भाषिक जनता या लढ्याची धार वरचेवर तीव्र करत चालली आहे.हा  लढा केवळ बेळगाव कारवार निप्पाणी, बिदर आणि भालकीच्या नेत्यांचा नसून महाराष्ट्र सरकारचा आहे. हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यायला हवे. कारण  1956 साली भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्रातील 865 खेडी व मराठी भाग म्हैसूर प्रांतात अन्यायकारक पद्धतीने डांबण्यात आला. तेव्हा महाराष्ट्राने त्यांचा प्रभाग कर्नाटकाच्या जोखडातून सोडवून घेण्यासाठी जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे परखड मत  माजी महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारचे सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले असून हा प्रश्न सुटावा म्हणून आता महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
(2)
  
रेणू किल्लेकर,(माजी उपमहापौर) 
फक्त काळी फीत बांधून निषेध  करणे योग्य नसून महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, आज आमची तिसरी पिढी सीमा प्रश्नासाठी लढा देत असताना, महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल रेणू किल्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, महाराष्ट्राकडे ताकद आहे.  पण सरकार त्याचा वापर करत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. न्यायालयीन लढ्या बरोबर रस्त्यावरची लढाईही तितकीच महत्त्वाची आहे तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांनी रस्त्यावर उतरणे काळाची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

धर्मवीर संभाजी उद्यानापासून सुरू झालेल्या मूक सायकल फेरीची शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागातील विविध गल्ल्यांमध्ये फिरून कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे गोवावेस मराठा मंदिरे येथे यशस्वी सांगता झाली.

या मूकसायकल फेरीत म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, तालुका युवा आघाडीचे संतोष मंडलिक,आर. एम.चौगुले, ॲड. महेश बिर्जे, ॲड. सुधीर चव्हाण महेश जुवेकर, दत्ता उघाडे, चंद्रकांत कोंडुसकर,मदन बामणे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंके, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, साधना पाटील, शिवानी पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, सुधा भातकांडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.