• मेलबर्नमध्ये टीम इंडियाची दिवाळी 
  • विराट कोहली - हार्दिक पांड्याची अफलातून खेळी 
  • पाकिस्तानच्या हातातून खेचून आणला विजय    
  • चार गडी राखून केली मात
  • भारतीयांना दिले दिवाळीचे गिफ्ट 

मेलबर्न दि. 23 ऑक्टोबर : IND vs PAK, T20 World Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) आक्रमक खेळीच्या जोरावर थरारक सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून धुव्वा उडवला.

हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांनी दिवाळीमध्येच जोरदार मैदानात फटाकेबाजी केली आणि त्यामुळेच भारताला पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवता आला. पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण त्यानंतर हार्दिक आणि कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली व त्यामुळेच भारताला विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवता आला. विराटने यावेळी तुफानी फटकेबाज केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पंड्या यावेळी ४० धावांवर बाद झाला. भारताने यावेळी चार विकेट्स राखून पाकिस्तानवर विजय साकारला.

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची निराशाजनक सुरुवात झाली. कारण रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघेही प्रत्येकी चार धावांवर बाद झाले आणि भारताला दुहेरी धक्के बसले. त्यानंतर सूर्यकुमारने काही काळ फलंदाजी केली, पण तो यावेळी १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला अक्षर पटेल हा चुकीमुळे धावचीत झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. पण त्यानंतर कोहली आणि हार्दिक यांनी दमदार फटकेबाजी केली आणि भारताला विजयाची आशा दाखवली.


तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. यावेळी अर्शदीपने आपल्या पहिल्याच चेंडूवर  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. बाबरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. अर्शदीप फक्त एवढ्यावरच थांबला नाही. कारण त्यानंतरच्या चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही तंबूचा रस्ता दाखवला. अर्शदीपने यावेळी रिझवानला फक्त चार धावांवर असताना बाद केले. या सामन्यात मोठा बदल घडवला तो इफ्तिकार अहमदच्या अर्धशतकाच्या जोरावर. कारण यावेळी अहमदने धडाकेबाज फलंदाजी केली आणि आपले अर्धशतक झळकावले. अहमदने यावेळी अक्षर पटेलच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले आणि संघाला सावरले. पण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यावेळी अहमदला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. अहमदला यावेळी ५१ धावांची खेळी साकारता आली.

रोहितने अक्षर पटेलच्या षटकात जास्त धावा गेल्यावर शमीच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि त्याने भारताला यश मिळवून दिले. त्यामुळे पुन्हा एकदा हा सामना भारताच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारताला एकामागून एक यश मिळवून दिले. शाबाद अहमद, हैदर अली आणि मोहम्मद नवाज यांना एकामागून एक बाद करत हार्दिकने भारताला तिहेरी यश मिळवून दिले. त्यामुळेच भारताला पाकिस्तानला १५९ धावांवर रोखता आले.