- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
दिल्ली : महायुती सरकार बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला आपल्या मागण्यांसाठी मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
रविवारी दिल्ली मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना दरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली, त्यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना असे आश्वासन दिले आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती झाली नाही ती नियुक्ती व्हावी, २०२२ पासून उच्च अधिकार समितीची बैठक झाली नाही हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे म्हणणे योग्य आहे. या संदर्भात मी महाराष्ट्राचे वकील शिवाजीराव जाधव यांच्याशी बोललो असून समितीच्या सर्व मागण्या पूर्ण होतील जेणेकरून मुंबईत समितीला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली महाराष्ट्र शासनाने सीमा प्रश्नावर उच्च अधिकार समितीची बैठक घ्यावी सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला ज्येष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांना सुनावणीसाठी थांबण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागण्या मध्यवर्ती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव बाबू कोले, सुनील आनंदाचे, मारुती मरगानाचे आदी उपस्थित होते.
0 Comments