• पहिले पाच दिवस शाकाहारी 

खानापूर / प्रतिनिधी 

नंदगड येथील श्री ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे पहिले पाच दिवस पूर्णतः शाकाहारी राहणार आहेत. या काळात देवीच्या नैवेद्यापासून घरोघरी भोजनव्यवस्था सुद्धा शाकाहारीच असणार आहे. तर रविवार, दि. १७ फेब्रुवारीपासून धार्मिक परंपरेनुसार मांसाहारी भोजन व्यवस्थेला मान्यता दिली जाईल.

बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर देवीची भव्य मिरवणूक होणार असून ती नंदगड गावातील विविध भागांत चार दिवस ओटी भरण्यासाठी फिरणार आहे. या टप्प्यात धार्मिक विधींसह नैवेद्य कार्यक्रम शाकाहारी असतील.

रविवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव होणार असून देवी गदगेवर विराजमान होईल. सायंकाळी चार वाजता देवीसमोर धार्मिक रितीरिवाजानुसार पारंपरिक ‘रेडा फिरवण्याचा’ कार्यक्रम होईल. त्यानंतर मांसाहारी भोजनला परवानगी दिली जाणार आहे. या यात्रेत गावकरी आणि भाविकांनी शाकाहारी व मांसाहारी व्यवस्थेमध्ये संतुलन राखत धार्मिक परंपरेचा मान राखण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.