बेळगाव : कॅपिटल ही संस्था अर्थकारणाशी निगडित असून आपल्या दैनंदिन कामकाजा बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. संस्था गेली सतरा वर्षे सातत्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन यशस्वीपणे करीत असून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संस्थेने  एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यंदा भरविण्यात आलेल्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता संभारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी प्रास्तविक व स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट करीत मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचे महत्त्व सांगून निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन करण्याचे आवाहनही  त्यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. अमित सुब्रमण्यम पृथ्वी करिअर ॲकॅडमीचे डायरेक्टर आणि ज्योती करिअर ॲकॅडमी उपस्थित होते. दहावी नंतर काय यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शिक्षणाला पर्याय नाही. हे ज्वलंत उदाहरणासाहित पटवून दिले. 

शैक्षणिक दालनाच्या वतीने गेल्या वर्षातील शिबिरार्थी मधून विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रक्कम मानचिन्ह व पारितोषिकं देऊन गौरव करण्यात आला. कु. कुशल गोरल हिने आपल्या यशामध्ये कॅपिटल वन चा मोठा वाटा असल्याचे नमूद करून शिबिरार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.

यावर्षीच्या शिबिरातील कु. गायत्री मुळे व संजना चौगुले (बालवीर विद्यानिकेतन हायस्कूल बेळगुंदी) या विद्यार्थिनीनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी कॅपिटल वन ची ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी कशी आणि किती उपयोगी ठरत आहे हे सांगितले.

यानंतर या वर्षीच्या गुरुजनांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. यावेळी सर्वश्री सी.आय.पाटील, रणजित चौगुले व सुनील लाड हे शिक्षक उपस्थितीत होते.

सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक शाम सुतार, शिवाजी अतिवाडकर, श्री रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, संस्थेने कर्मचारी, पिगमी संकलक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित चौगुले सरानी केले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.