• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना
  • जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास करावयाच्या खबरदारीबाबत ग्रामपंचायतींमध्ये दर महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सोमवारी (२४ जून) जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून  ते बोलत होते.

पूरपरिस्थितीचे पुरेपूर व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्स समित्यांनी अनिवार्यपणे बैठका घ्याव्यात आणि बैठकीचे इतिवृत्त न चुकता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावे.आधीच ओळखल्या गेलेल्या पूरप्रवण ग्रामपंचायतींची दर पंधरवड्याला बैठक झाली पाहिजे. पुराच्या काळात ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शहर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये ओळखल्या जाणाऱ्या मदत केंद्रांना संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन मदत केंद्रांमधील सुविधांची पाहणी करून संपूर्ण तपशील छायाचित्रांसह द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पुराच्या काळात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या औषधांचा तात्काळ साठा करण्याबरोबरच,विषारी जीवांच्या चाव्याव्दारे होणारे मृत्यू व त्रास टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा न चुकता करावा. पूर परिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व नोडल अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले.

या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.