खानापूर / प्रतिनिधी 

हलशीवाडी येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये गर्लगुंजी संघाने विजेतेपद मिळविले असून युवा स्पोर्ट्स हलशीवाडी संघ उपविजेता ठरला आहे.

हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सतर्फे शुक्रवारपासून गावातील विठ्ठल मंदिर समोरील मैदानावर हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  प्रारंभी माजी आमदार अरविंद पाटील, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, हलशी ग्राम पंचायत अध्यक्ष पांडुरंग बावकर, हलगा पंचायतीचे सदस्य रणजित पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पुजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार अरविंद पाटील यांनी केंद्र सरकारकडून खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  त्याचप्रमाणे ठिक ठिकाणी मैदानांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.  त्यामुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्याचा खेळाडूंनी लाभ घेणे गरजेचे असून, खेळामुळे शरीराला चांगला व्यायामाचा लाभ होतो.  त्यामुळे खेळाडूंनी मोठ्या संख्येने व्यायामाकडेही लक्ष द्यावेत असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शिवाजी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किरण देसाई, अर्जुन देसाई, प्रभाकर देसाई यांनीही मार्गदर्शन केले. युवा स्पोर्ट्रसचे  मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रघुनाथ देसाई, पांडुरंग देसाई, वामन देसाई, विलास देसाई, कुमार देसाई, राजन सुतार, नरसिंग देसाई यांनी स्वागत केले. यावेळी नागेश भोसले, संजय हलगेकर, राजू देसाई, निंगाप्पा होसुर आदी उपस्थित होते.

स्पर्धेला पहिल्या दिवसापासूनच मोठा प्रतिसाद मिळाला रविवारी सायंकाळी लक्ष्मण देसाई यांच्या हस्ते नाणेफेक करून अंतिम सांमन्याला सुरुवात करण्यात आली.  यावेळी गर्लगुंजी संघाने युवा स्पोर्टस हलशीवाडी संघावर तीन धावानी विजय मिळवला. त्यानंतर युवा स्पोर्टसच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या व उप विजेत्या संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर युवा स्पोर्ट्सच्या भुजंग देसाई व गर्लगुंजी संघाच्या नागराज पाटील याला उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज म्हणून गौरवीण्यात आले.