• वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  
  • चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत !

मुंबई,   जून : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती. मात्र रुग्णालयामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी ( ५ मे ) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती. रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याआधी त्यांना ऑक्सिजन दिला जात होता. मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा श्वास घेण्यात अडचण येत होती. ३ आठवडे उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुलोचना दीदी यांनी दिलेलं योगदान अमुल्य आहे. सुलोचना लाटकर यांची सुलोचना दीदी या नावानेच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचना दीदींची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली. चित्रपटाआधी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकलं. हा प्रयोग शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी झाला होता.

मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.