- महापौर शोभा सोमनाचे यांचे नागरिकांना आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयाच्या डेड स्टॉक मध्ये आता केवळ तीन फूट पाणीसाठा शिल्लक असून पाणी पातळीत वाढ होण्यासाठी प्रशासनाची पावसावरच भिस्त आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह महापालिका, पाणीपुरवठा मंडळ आणि एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली, तसेच अधिकाऱ्यांकडून जलाशयातील पाणीसाठा, तो किती दिवस पुरेल आदि बाबींची माहिती घेतली. यावेळी महापौर शोभा सोमनाचे यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.
पाहणीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापौर शोभा सोमनाचे यांनी राकसकोप धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आम्ही जलाशयाची पाहणी केली आहे. पाऊस लगेच झाला तर पाणी पातळीत वाढ होऊ शकेल. मात्र सद्य परिस्थितीत सुरळीत पाणीपुरवठा करताना समस्या उद्भवत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केयूआयडीएफसी अधीक्षक अभियंता अशोक बुरकुले यांनी राकसकोप जलाशयातून ६८ एमएलडी पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे. बेळगाव शहराला येथून नियमित ५५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या पाणी पातळीत घट झाल्याने केवळ ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. येत्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून पाऊस झाला की सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नगरसेवक श्रेयस नाकाडी, सहाय्यक कार्यकारी अभियंता शशिकुमार हट्टी, सहाय्यक अभियंता उमेश निट्टूरकर, केयूडब्ल्यएस अँड डीबी सहाय्यक अभियंता मंजुनाथ, स्मार्ट सिटी टीम लीडर रामचंद्रय्या, एलअँडटीओ एम रवी कुमार, मनपा पर्यावरण अभियंते कलादगी आणि प्रवीण उपस्थित होते.
0 Comments