• 'बेळगावी वॉर्ड समिती बळग' संघटनेची मागणी 
  • महापौर - उपमहापौर, मनपा आयुक्तांना दिले निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहराचा योग्य पद्धतीने विकास व्हावा यासाठी स्थानिक जाणकार नागरिकांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी बेळगावी वॉर्ड समिती बळग या संघटनेतर्फे महापौर उपमहापौर आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.

सद्यस्थितीत शहरातील परिस्थिती पाहता शहराच्या विकासासाठी हातभार लावण्याचा उद्देशाने  विविध प्रभागांमधील १५ हून अधिक अनुभवी नागरिकांनी एकत्र येत  'बेळगावी वॉर्ड समिती बळग' ही संघटना स्थापन केली आहे.

गुरुवारी संघटनेच्या वतीने गौरी गजबर यांच्या नेतृत्वाखाली महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि महापालिका आयुक्तांच्या नावे सहाय्यक उपायुक्त  भाग्यश्री हुग्गी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात स्थानिक नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन केल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसून होणारे फायदे, जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास होणारी मदत, योग्य प्रकारे होऊ शकणारा शहराचा विकास या बाबी स्पष्ट करण्यात आल्या असून तात्काळ समित्या स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलावे अशी विनंती करण्यात आली आहे.